नवउदारमतवादाचा अंत होतोय; पुढे काय? – रूटगर ब्रेगमॅन

नवउदारमतवादाचा अंत होतोय; पुढे काय? –  रूटगर ब्रेगमॅन

मागील 40 वर्षे वर्चस्व गाजवणारी विचारधारा अस्तंगत होत आहे. तिची जागा कोण घेईल? कोणालाही हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. याची कल्पना करणे कठीण नाहीये, की हा पेचप्रसंग आपणाला यापेक्षाही अधिक गडद अंधार्‍या मार्गावर घेऊन जाईल. राज्यकर्ते अधिक सत्ता हस्तगत करण्यासाठी त्याचा वापर करतील. ते त्यांच्या जनतेच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालतील आणि वंशवाद व द्वेषाच्या ज्वालांना भडकवतील; परंतु परिस्थिती भिन्न असू शकते. गोष्टी बदलू शकतात. आपण इतर मार्गानेसुद्धा कल्पना करू शकतो.

1.
काही लोकांना असे वाटते, की या ‘कोविड-19’ महामारीचे राजकीयीकरण करू नये. हे असे करणे म्हणजे आपण स्वतःबरोबर आहोत या वातावरणात वावरण्यासारखे आहे. हे असे वागणे म्हणजे एखाद्या कट्टर धार्मिक नेत्याने हा देवाचा प्रकोप आहे किंवा हा ‘चायनीज व्हायरस’ आहे, असे म्हणून लोकांना घाबरवून टाकणे किंवा कल कसा आहे, हे पाहून आपण सर्व जण प्रेम, काळजी, जागरूकता यांच्या नवीन युगात प्रवेश करत आहोत आणि जिथे सर्वांसाठी पैसे मोफत असतील, अशी भविष्यवाणी करण्यासारखे आहे. जगात असेही काही लोक आहेत. ज्यांना असे वाटते, की आता बोलण्याची खरंच वेळ आली आहे. आता बोललेच पाहिजे. आता या क्षणाला जे निर्णय घेतले जात आहेत, त्यांचे भविष्यात दूरगामी परिणाम होतील किंवा ओबामांच्या कर्मचारीवर्गाच्या प्रमुखाने सन 2008 मध्ये लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीनंतर एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले, की ‘एखादा गंभीर प्रेचप्रसंग वाया जाऊ नये, असे तुम्हाला कधीही वाटणार नाही.’
सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये माझा नाही म्हणणार्‍यांच्या बाजूने राहण्याचा कल होता. मी यापूर्वी प्रेचप्रसंग संधी निर्माण करतात याबद्दल लिहिले होते; परंतु आता हे क्लृप्तीविहीन अगदी अपमानास्पद वाटायला लागले आहे. त्यानंतर आणखी बरेच दिवस गेले. हळूहळू असे दृष्टीस यायला लागले, की पेचप्रसंग काही महिने, एखादे वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी लांबणार आहे आणि एखादे दिवशी हे सगळे तात्पुरत्या कालावधीसाठी लादलेले प्रेचप्रसंग विरोधी उपाय कायमस्वरूपी बस्तान मांडून बसतील. आपल्या पुढ्यात काय मांडून ठेवलंय हे कोणालाही माहीत नाही; परंतु हे नेमकेअशामुळे, की आपल्याला माहीत नाही. भविष्य अत्यंत अनिश्‍चित आहे. आपण याविषयी बोललं पाहिजे.


लाट वळत आहे


4 एप्रिल 2020 रोजी ब्रिटनस्थित फायनान्शिअल टाइम्सने एक संपादकीय प्रकाशित केले, जे येणार्‍या काही वर्षांमध्ये इतिहासकार उद्धृत करतील, यात शंका नाही. फायनान्शिअल टाइम्स हे जगातील आघाडीचे व्यापारी वृत्तपत्र आहे; परंतु प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास हे वृत्तपत्र अगदीच पुरोगामी विचारांचे नाहीये. वैश्‍विक राजकारण आणि भांडवल यामधील सर्वांत धनाढ्य व सर्वशक्तिमान लोकांकडून हे वृत्तपत्र वाचले जाते. प्रत्येक महिन्याला हे वृत्तपत्र निर्लज्जपणे “How to spend it” (खर्च कसा करावा) असे शीर्षक असलेली मासिक पुरवणी जहाज, महल, घड्याळे आणि कार याविषयी प्रकाशित करत असते; परंतु या संस्मरणीय शनिवारच्या सकाळी या वृत्तपत्राने हे प्रकाशित केले, “पुरोगामी सुधारकांना… मागील चार दशकांतील रूढ असलेल्या योजनेच्या दिशेला विरुद्ध दिशेने वळवत आहेत… ठेबलावर ठेवणे गरजेचे आहे. सरकारांनी अर्थव्यवस्थेमध्ये अधिक सक्रिय भूमिका स्वीकारण्याची गरज आहे. त्यांनी सार्वजनिक सेवांकडे एक उत्तरदायित्व म्हणून न पाहता एक गुंतवणूक म्हणून पाहिलेच पाहिजे आणि त्यांनी कामगार बाजाराला कमी असुरक्षित करण्यासाठी नवीन मार्ग शोधले पाहिजेत. अजेंड्यावर पुनर्वितरण पुन्हा येईल. ज्येष्ठ नागरिक आणि श्रीमंत लोकांना दिलेल्या विशेषाधिकार यांच्यावर प्रश्‍नचिन्ह उठेल. पायाभूत उत्पन्न आणि संपत्तीवरील कर अशा आजपर्यंत विचित्र गणल्या गेलेल्या योजनांची सरमिसळ होईलंच?”
इथे हे काय चालले आहे? भांडवलदारांचे हे व्यासपीठ हे असे अचानकपणे अधिक पुनर्वितरण, मोठी सरकारे आणि अगदी मूळ उत्पन्नाची कशी काय वकिली करायला लागले आहे? अनेक दशके ही संख्या छोटे सरकार, कमी कर, मर्यादित सामाजिक सुरक्षितता अशा भांडवलवादी नमुन्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली किंवा जवळजवळ टोकदार कडांनी बंदिस्त राहिली.
“मी तहहयात तिथे काम केले आहे. फायनान्शिअल टाईम्सने मानवी चेहरा असलेल्या मुक्त व्यापारी भांडवलवादाची वकिली केली आहे. संपादकीय मंडळाने आपणाला या स्वरूपात मोठी नवीन दिशा दिली आहे. असा त्या वृत्तपत्रासाठी सन 1986 पासून लिहिलेल्या पत्रकाराने प्रतिसाद दिला. ”
त्या संपादकीयमध्ये या सगळ्या कल्पना केवळ आकाशातून आलेल्या नाहीत. त्यांनी खूप दीर्घ अंतराचा प्रवास केला आहे. काठापासून ते मध्यभागापर्यंतचा हा प्रवास झालेला आहे. हा प्रवास अराजकी, अशांत शहरांपासून ते प्राइम टाइम टॉक शोज आणि संदिग्ध ब्लॉग्जपासून ते फायनान्शिअल टाइम्सपर्यंतचा राहिलेला आहे आणि आता दुसर्‍या महायुद्धापासूनच्या सर्वांत मोठ्या पेचप्रसंगामध्ये त्या कल्पना जगाला बदलवून टाकतील. आपण इथे कसे पोहोचलो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये एक पाऊल मागे जावे लागेल. आता याची कल्पना करावयास आपणाला कठीण जाईल. साधारणपणे 70 वर्षांपूर्वी असा एक काळ होता, ज्यावेळी मूलगामीवाद्यांनी मुक्त व्यापारी भांडवलाची बाजू घेतली. त्यांनी त्यांचं संरक्षण केले.
सन 1947 मध्ये स्वित्झर्लंडमधील माँट पेलेरिन या खेडेगावात एक छोटा विचार गट स्थापन करण्यात आला होता. ही माँट पेलेरिन सोसायटी स्वयंघोषित ‘नवउतारमतवादी’ लोकांची मिळून बनली आहे. त्यामध्ये फ्रेडरिक हायेक यांच्यासारखे तत्त्वज्ञ आणि मिल्टन फ्राईडमन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांचा समावेश होता. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या त्या दिवसांमध्ये अनेक राजकारण्यांनी आणि अर्थतज्ज्ञांनी ब्रिटिश अर्थतज्ज्ञ आणि भक्कम राज्याचा पुरस्कर्ता असलेल्या जॉन मेयर्ड केन्स यांच्या अधिक कर आणि मजबूत सामाजिक सुरक्षितता जाळे/यंत्रणेचा स्वीकार केला. नवउदारमतवादी लोकांना विरोधाभासाने अशी भीती वाटली, की उदयाला येणारी राज्ये एका नवीन प्रकारच्या जुलूमशाहीस प्रारंभ करतील, म्हणून मग त्यांनी बंड केले. आपणास खूप दीर्घ पल्ल्याचा प्रवास करावयाचा आहे, हे माँट पेलेरिन सोसायटीच्या सभासदांना ठाऊक होते. नवीन विचारांना रुजण्यासाठी ‘साधारणपणे एक पिढी किंवा त्यापेक्षाही जास्त कलावधी’ लागत असतो आणि त्यामुळेच… आपला वर्तमान विचार हा घटनांना प्रभावित करण्यासाठी खूपच दुबळा पडतो आहे असे दिसते, असे हायेकने नमूद केले.
फ्राईडमनलासुद्धा असेच वाटत होते. ते म्हणतात, “आज देशाला चालविणारे लोक दोन दशकांपूर्वीच्या बुद्धिजीवी वातावरणास प्रतिबिंबित करतात… जेव्हा ते लोक महाविद्यालयात शिक्षण घेत होते.” ते म्हणतात, की अनेक लोकांच्या मूलभूत कल्पना त्यांच्या किशोरावस्थेमध्येच विकसित होत असतात. हे विशद करते, की कशामुळे किंवा कोणत्या कारणामुळे जुने सिद्धांत आजच्या राजकीय जगामध्ये काय घडत आहे यावर अजूनही वर्चस्व गाजवताना दिसतात.
फ्राईडमन हा मुक्त व्यापार तत्त्वांचा पुरस्कार करणारा एक इव्हन्जेलिस्ट होता. त्याचा स्वहित संबंधाच्या प्राथमिकतेवर विश्‍वास होता. समस्या कोणतीही असली तरी त्यासाठी त्याचा उपाय साधा होता ः सरकारला बाहेर काढा, व्यापार चिरायु होवो किंवा दुसर्‍या शब्दांत सांगायचे, तर सरकारने प्रत्येक विभागाला व्यापारी स्थानामध्ये रूपांतरित करावे. म्हणजे अगदी आरोग्य सुविधांपासून ते शिक्षणाच्या सगळ्या यंत्रणांचे व्यापारीकरण करावे. गरज पडल्यास सरकारने बळाचा वापर करावा. अगदी नैसर्गिक आपत्तीमध्येदेखील स्पर्धात्मक कंपन्यांनीच आधार सुविधांचे आयोजन करण्याचे नेतृत्व करावे. फ्राईडमनला माहीत होते, की तो मुख्य धारेपासून फार दूर अंतरावर थांबला होता; परंतु त्यामुळे त्यास ऊर्जा मिळाली. सन 1969 मध्ये टाइम मासिकाने या अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा गौरव केला व त्यास असे वैशिष्ट्यीकृत केले, की “हा पॅरिसचा डिझायनर आहे, ज्याचे महागडे फॅशनेबल कपडे काही ठराविक लोकच खरेदी करतात; परंतु असे असले तरीही हा डिझायनर जवळपास सगळ्याच लोकप्रिय फॅशन्सना प्रभावित करतो.”


फ्राईडमनच्या विचारांमध्ये प्रेचप्रसंगी मध्यवर्ती भूमिका पार पाडली. त्याच्या ‘भांडवल आणि स्वातंत्र्य’ (Capital And Freedom) 1982) या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्याने अतिशय प्रसिद्ध असणारे पुढील शब्द लिहिले, “केवळ प्रेचप्रसंगच – वास्तविक किंवा जाणवलेले – खरा बदल घडवतात. जेव्हा ते प्रेचप्रसंग उद्भवतात – तेव्हा ज्या कृती केल्या जातात त्या अवतीभोवतीच्या कल्पनांवर अवलंबून असतात.” आपल्या अवतीभोवतीच्या कल्पना विखुरलेल्या असतात, फ्राईडमनच्या मते, पेचप्रसंगामध्ये जे काही घडते ते सगळे आपण जो पाया घातला आहे किंवा आपण जे ग्राउंडवर्क केले आहे, त्यावर अवलंबून असते. तेव्हा कल्पनांना एकदाचा अवास्तविक किंवा अशक्य म्हणून बाहेरचा रस्ता दाखविला, की मग त्या फक्त अटळ बनण्याची शक्यता असते आणि हुबेहूब असेच घडले. सन 1970 च्या दशकामधील पेेचप्रसंगादरम्यान (आर्थिक संकोच, चलनवाढ आणि ओपेक खनिज तेल मनाईहुकूम) नवउदारमतवादी विचार तयार होते आणि ते पंख फुटण्याची वाट पाहत होते. इतिहासकार अ‍ॅन्गस बरगिन निष्कर्ष स्वरूपात म्हणतात, एकत्रितपणे त्यांनी वैश्‍विक योजना रूपांतरणाला घडविण्यास मदत केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन आणि ग्रेट ब्रिटेनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यासारख्या परंपराप्रिय नेत्यांनी हायेक आणि फ्राईडमनच्या कधी काळी मूलगामीवादी असणार्‍या कल्पनांचा अंगीकार केला आणि नंतरच्या कालावधीत बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर अशा त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले.
मग एकापाठोपाठ एक संपूर्ण जगभरामध्ये राज्याच्या मालकीच्या उद्योगधंद्यांच्या खासगीकरणाचा सपाटाच सुरू झाला. कामगार संघटनांवर बंधने घातली गेली. त्यांचे पंख छाटण्यात आले. सामाजिक फायदे बंद करण्यात आले. रिगनने त्यावेळी इंग्रजी भाषेतील सर्वांत भयानक असे नऊ शब्द उच्चारले होते. ते म्हणाले, ‘मी सरकारकडून आलो आहे आणि मी इथे मदत करण्यासाठी आहे.’ सन 1989 मध्ये कम्युनिझमचा पाडाव झाल्यानंतर अगदी सामाजिक लोकशाहीवाद्यांचादेखील सरकारमधील विश्‍वास उडाल्याचे दिसून आले.
सन 1996 मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी संघराज्याला उद्देशून जे भाषण केले होते त्यात ते म्हणाले, की ‘आता मोठ्या  सरकारचे युग संपले आहे.’
नवउदारमत विचार गटांकडून ते पत्रकारांपर्यंत आणि पत्रकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत पसरला. एखाद्या विषाणूप्रमाणे त्याने सगळ्या लोकांना संक्रमित केले. सन 2002 मध्ये एका रात्रीच्या भोजनप्रसंगी आपली सर्वांत श्रेष्ठ अशी उपलब्धी म्हणून आपण कशाकडे पाहता, असा प्रश्‍न मार्गारेट थॅचर यांना विचारण्यात आला. त्यांचे उत्तर काय असावे? ‘टोनी ब्लेअर आणि नवीन श्रमिक. आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांचे मन बदलवण्यासाठी भाग पाडले.’


आणि मग त्यानंतर 2008 आले


15 सप्टेंबर 2008 रोजी अमेरिकेतील बँक लेहमन ब्रदर्सने आर्थिक मंदी (ग्रेट डिप्रेशन) नंतरच्या सर्वांत वाईट अशा आर्थिक पेेचप्रसंगाला मोकाट सोडले. जेव्हा तथाकथित ‘मुक्त’ व्यापाराला वाचविण्यासाठी मोठ्या सरकारी आर्थिक मदतीची (बेल आउटची) गरज पडली तेव्हा त्याने नवउदारमतवाद कोसळत असल्याचा इशाराच दिला आणि तरीही, 2008 वर्षाने एक ऐतिहासिक वळण बिंदू म्हणून नोंद केली नाही. एका देशापाठोपाठ दुसर्‍या देशाने त्यांच्या डाव्या विचारांच्या राजकारण्यांना पराभूत केले. शिक्षण, आरोग्य सेवासुविधा आणि सामाजिक सुरक्षितता यांच्यावर मोठे खोलवर आघात झाले. अगदी समानतेमधील अंतर वाढले आणि वॉल स्ट्रीटवरील बोनसने विक्रमी उच्चांक गाठला.
फायनान्शिअल टाइम्सने आर्थिक संकटानंतर एका वर्षाने ‘हाऊ टू स्पेण्ड इट’ (खर्च कसा करावा) ही आरामदायी जीवनशैली मासिकाची ऑनलाइन आवृत्ती प्रकाशित केली होती.
1970 च्या पेचप्रसंगीची तयारी करण्यासाठी नवउदारमतवाद्यांनी अनेक वर्षे खर्ची घातली होती. आता त्यांच्या समोरील आवाहनकर्ते रिकाम्या हाताने उभे होते. अनेकदा त्यांना केवळ एवढेच माहीत होते, की ते कोणाच्या विरुद्ध होते. ते सामाजिक हितसंबंध वा कल्याणकारी योजनांवर पैसे खर्च करण्याच्या विरुद्ध उभे होते. ते पायाभूत सोयी-सुविधांच्या विरुद्ध उभे होते; परंतु कार्यक्रम काय होता? हे पुरेसे स्पष्ट नव्हते, की ते कोणासाठी होते? आता 12 वर्षांनंतर पेचप्रसंगाने पुन्हा आघात केला आहे. हा आघात अधिक विध्वंसकारी, अधिक धक्कादायक आणि अधिक प्राणघातक आहे. ब्रिटिश केंद्रीय बँकेनुसार 1709 च्या हिवाळ्यापासून युनायटेड किंगडम हे मोठ्या आर्थिक मंदीच्या पूर्वसंध्येवर उभे आहे. फक्त तीन आठवड्यांच्या अवकाशामध्ये युनायटेड स्टेटस्मधील 17 दशलक्ष लोकांनी आर्थिक आघात रकमेसाठी अर्ज केला होता. 2008 मधील आर्थिक पेचप्रसंगामध्ये देशाला या संख्येची अगदी अर्धी संख्या गाठण्यासाठी संपूर्ण दोन वर्षे लागली.
2008 च्या पेचप्रसंगाच्या विरुद्ध पाहता कोरोना विषाणू पेचप्रसंगाचे कारण स्पष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांना ‘अप्रत्यक्ष ऋण दायित्व’ (Collateralized Debt Obligations) किंवा ‘के्रडिट डिफॉल्ट स्वॅप्स’ (असा एक आर्थिक करार ज्यानुसार रोख्यांच्या स्वरूपात कॉर्पोरेट किंवा सार्वभौम ऋण खरेदीदार संभाव्य तोटा दूर करण्याचा प्रयत्न करतो.) काय होते याचा काहीच सुगावा नव्हता; परंतु आपणा सर्वांना हा विषाणू काय आहे, याची माहिती आहे. 2008 नंतर दिशाहीन बँकर्सनी हा दोष कर्जधारकांवर स्थानांतरित करण्याचा प्रयत्न केला; परंतु ही युक्ती आज स्वीकारली जाणार नाही. लोक त्यास स्वीकारणार नाहीत; परंतु 2008 साली आज यामधील सर्वांत महत्त्वपूर्ण भेद काय आहे? तर तो भेद आहे, बौद्धिक पायाभूत काम. आपल्या अवतीभोवती कल्पना असतात. जर फ्राईडमनबरोबर असते आणि पेचप्रसंग असंभवनीयतेला अटळ बनवते, अशा वेळेला इतिहास एक खूपच भिन्न वळण घेऊ शकेल. त्याची जास्त शक्यता असते.


2. तीन धोकादायक फ्रेंच अर्थतज्ज्ञ


ऑक्टोबर 2019 मध्ये अति उजव्या वेबसाइटने एक ठळक बातमी दिली. ती अशी होती, ‘तरुण लोकांच्या अर्थव्यवस्था आणि भांडवलाबद्दलच्या दृष्टिकोनावर तीन अति डाव्या अर्थतज्ज्ञांचा प्रभाव.’ हा अशाच कमी खर्चिक ब्लॉग्जपैकी एक होता, जे खोट्या बातम्या पसरविण्यामध्ये फारच मोठी प्रगती करतात; परंतु या तीन फ्रेंच अर्थतज्ज्ञांच्या प्रभावाबद्दल असलेल्या या शीर्षकाने अगदी बरोबर अशी गोष्ट सांगितली.


मला आठवते, की त्या तीन अर्थतज्ज्ञांपैकी एकाचे नाव पहिल्यांदा माझ्या वाचण्यात आले. त्यांचे नाव होते थॉमस पिकेटी. सन 2013 च्या शरद व शिशिर ऋतूचा तो काळ होता आणि मी अर्थतज्ज्ञ ब्रॅन्को मिलानोविकचा ब्लॉग वाचत होतो. मी नेहमीच त्याचा ब्लॉग वाचत असतो. कारण त्याची त्याच्या सहकार्‍यांवरील तीव्र शब्दांतील टीका फारच मनोरंजन करणारी होती; परंतु या विशिष्ट ब्लॉगमध्ये मिलानोवीकने अचानकपणे खूपच भिन्न असा सूर लावला होता. त्याने नुकतेच फ्रेंच भाषेतील 970 पानांचे एक जाडजूड पुस्तक वाचून पूर्ण केले होते आणि तो त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होता. तो त्याची प्रसंशा करताना म्हणाला, ‘आर्थिक विचारामधील युग निर्माण करणारे.’ हो… असेच वाक्य त्याने त्याच्या ब्लॉगमध्ये वापरले होते.
मिलानोविक हा खूप वर्षे अशा फार कमी अर्थतज्ज्ञांपैकी एक होता, ज्याने असमानतेमधील संशोधनात फारच थोडा रस घेतला होता. त्याचे अनेक सहकारी तर त्या विषयाला स्पर्शदेखील करत नसत. सन 2003 मध्ये नोबेल विजेते रॉबर्ट लुकास यांनी असा दावा केला होता, की वितरणाच्या प्रश्‍नांमधील संशोधन हे ‘निरोगी अर्थशास्त्रासाठी फारच घातक आहे.’ दरम्यानच्या कालावधीत पिकेटीने अगोदरच पायाभूत काम करण्यास सुरुवातदेखील केली होती. सन 2001 मध्ये त्याने समजण्यास अत्यंत कठीण, अस्पस्ट असे एक पुस्तक प्रकाशित केले. त्यामध्ये त्याने समाजातील अगदी उच्चस्तरीय अशा 1 टक्का लोकांच्या उत्पन्नाचा हिस्सा दाखविणारा एक आलेख सादर केला. असा हा आलेख त्याने पहिल्यांदाच वापरला होता. फे्रंच त्रयींमधले क्रमांक दोनचे सहकारी अर्थतज्ज्ञ इमॅन्युअल सावेझ यांच्यासोबत पिकेटी यांनी त्यानंतर असे दाखवून दिले, की आज अमेरिकेतील असमानता 1920 मधील असमानतेएवढी उंच गेलेली आहे. अमेरिकेत 1920 च्या दशकामध्ये असमानतेचा आलेख फार मोठ्या प्रमाणावर वाढला होता. पिकेटीच्या या अकादमिक कामाने ‘वॉल स्ट्रीटचा कब्जा करा’ या आंदोलनाला प्रेरणा दिली. लोकांचा आक्रोश रस्त्यावर आला. आंदोलनकर्त्यांनी घोषणा केली, ‘आम्ही 99 टक्के आहोत.’
सन 2014 मध्ये पिकेटीने जगात वादळ उठविले. हा प्रोफेसर ‘रॉक स्टार अर्थतज्ज्ञ’ झाला. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. फायनान्शिअल टाइम्स टीका करण्यात अग्रस्थानी होते. पिकेटीने स्वतःची रेसिपी पत्रकारांसोबत आणि राजकारण्यांसोबत शेअर करण्यासाठी जगाचा दौरा केला. त्याच्या रेसिपीमध्ये कोणते घटक होते? अनेक कर हा त्याच्या रेसिपीमधला घटक होता. यामुळे आपणास फ्रेंच त्रयींमधला तिसर्‍या क्रमांकाचा तरुण अर्थतज्ज्ञ ग्रॅविएल झुकमॅन याच्या वैशिष्ट्याची ओळख झाली. सन 2008 मध्ये ज्यादिवशी लेहमन ब्रदर्स कोसळली, त्यावेळी या 21 वर्षीय तरुण अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याने फ्रेंच दलाल कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून प्रारंभ केला. त्यानंतर काही महिने गेले. झुकमॅनने वैश्‍विक वित्तीय व्यवस्था कोसळताना पाहिली. अगदी त्यावेळीदेखील लक्झेंबर्ग आणि बर्मुडासारख्या छोट्या देशांमधून प्रवाहित होणार्‍या खगोलीय गणितामुळे त्याला अनेक गोष्टी उमजल्या. लक्झेंबर्ग आणि बर्मुडा या देशांमध्ये जगातील अतिश्रीमंत लोक स्वतःची संपत्ती लपवत असतात. या देशात संपत्तीवर फार कमी प्रमाणात कर आकारला जातो. त्यामुळे असे देश या अतिश्रीमंतांसाठी कर वाचवण्यासाठी आश्रयस्थानच आहेत.

काही वर्षांमध्येच झुकमॅन जगातील एक आघाडीचा कर विशेषज्ञ म्हणून उदयास आला. त्याच्या ‘The Hidden Wealth of Nations’ (2015) या पुस्तकात त्याने हे दाखवून दिले, की जगातील 7.6 ट्रिलियन डॉलर एवढी संपत्ती या अशा लक्झेंबर्ग व बर्मुडासारख्या अत्यंत अल्प कर आकारणार्‍या देशात लपवली गेली आहे. इमॅन्युअल सायेझ याच्या सोबतीने त्याने लिहिलेल्या आणखी एका पुस्तकात त्याने हे निदर्शनास आणून दिले, की अमेरिकेतील हे सर्वाधिक 400 श्रीमंत लोक इतर प्रत्येक एकल उत्पन्न गटापेक्षा फारच कमी कर भरतात. म्हणजेच प्लंबर्सपासून ते साफसफाई करणार्‍या कामगारांपर्यंत आणि नर्सेसपासून ते निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांपेक्षाही हे 400 अतिश्रीमंत अमेरिकन लोक कमी कर भरतात.
या तरुण अर्थशास्त्रज्ञाला आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. झुकमॅनचे सल्लागार (मेन्टॉर) पिकेटी यांनी सन 2020 मध्ये आणखी एक पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक 1088 पृष्ठांचे असून, ते लवकरच बाजारात वाचकांच्या भेटीसाठी येणार आहे; परंतु झुकमॅन आणि सायेझ यांचे पुस्तक एका दिवसात वाचता येऊ शकते. पुस्तकाचे संक्षिप्त उपशीर्षक असे आहे : How the Rich Dodge Taxes and How to Make Them Pay .” नवीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने काय करावे, याची यादीच या पुस्तकात दिली आहे.
आता सर्वांत महत्त्वपूर्ण पाऊल काय असणार आहे? सगळ्या लक्षाधीशांवर चढत्या क्रमाने जाणारा वार्षिक संपत्ती कर आकारला गेला पाहिजे. यातून काय सिद्ध झाले, तर अधिक किंवा जास्तीचा कर अर्थव्यवस्थेसाठी वाईट असण्याची गरज नाही. विरोधाभासाने असे म्हणता येईल, की जास्तीचा कर भांडवलवादाला चांगलाच असतो. ते भांडवलवादास अधिक चांगल्या प्रकारे चालवतात.

सन 1952 मध्ये अमेरिकेत सर्वाधिक उत्पन्न कर गट 92 टक्के होता आणि यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अगोदरपेक्षाही वेगाने धावू लागली होती. तिच्यात वाढ झाली.
पाच वर्षांपूर्वी या अशा प्रकारच्या कल्पनांची वाच्यता करणे किंवा त्याबद्दल लिहिणे हे फारच पुरोगामी समजले जात होते. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या वित्तीय सल्लागारांनी त्यांना अशी हमी दिली होती, की अशा प्रकारचा संपत्ती कर कधीही फायदेशीर असणार नाही आणि श्रीमंत लोक (त्यांच्या लेखापाल व वकिलांच्या फौजेसह) त्यांचे पैसे लपवून ठेवण्याचे मार्ग नेहमीच शोधत राहतील.
फे्रंच त्रयींनी अगदी बर्नी सँडर्सच्या गटालादेखील त्यांच्या 2016 च्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी संपत्ती कर आराखडा करून देण्याची तयारी दर्शवली होती; परंतु बर्नी सँडर्स गटाने त्यास नकार दिला होता; परंतु आज आपण जेथे उभे आहोत त्यापासून सन 2016 हा एक वैचारिक अनंतकाळ फार दूर आहे. सन 2020 मध्ये सँडर्सचे ‘नेमस्त/मवाळ’ प्रतिस्पर्धी जो बिडेन हे हिलरी क्लिंटन यांनी चार वर्षांपूर्वी जी कर वृद्धी योजना तयार केली होती, त्याच्या दुप्पट कर वृद्धी करण्याचा प्रस्ताव तयार करत आहेत. या दिवसांमध्ये अमेरिकेतील बहुसंख्य मतदार (अगदी रिपब्लिकनांसह) हे अतिश्रीमंत लोकांकडून लक्षणीयरीत्या भरपूर कर वसूल करण्याच्या बाजूने उभे आहेत. दरम्यान, अगदी फायनान्शिअल टाइम्सने असा निष्कर्ष काढला, की संपत्ती कर ही काही वाईट गोष्ट नाहीये.

शँपेन समाजवादाच्या पल्याड

एकदा थॅचर उपरोधिकपणे म्हणाल्या, “समाजवादाबरोबरची समस्या अशी आहे, की तुम्ही अखेरीस इतर लोकांचे पैसे संपवता.” थॅचर यांनी दुसर्‍या ठिकाणी बोट ठेवले होते. डाव्या राजकारण्यांना कर आणि असमानता यावर बोलायला खूप आवडते; परंतु हे सगळे पैसे कोठून येणार?
राजकीय आसाच्या दोन्ही बाजूंवर हे चालू गृहीतक असते, की समाजाच्या वरील स्तरामध्ये सर्वाधिक संपत्ती ही जेफ बेझोस आणि एलन मस्क यांच्यासारख्या द्रष्ट्या उद्योगपतींनी ‘कमावलेली’ असते. ही गोष्ट त्यास नैतिक सदसद्विवेकबुद्धीच्या प्रश्‍नामध्ये रूपांतरित करते. पृथ्वीवरील या महाकाय धनाढ्य व्यक्तींनी त्यांच्या संपत्तीमधील काही संपत्ती इतरांसोबत शेअर करू नये का?
जर तुमची हीच समज असेल, तर मी तुम्हाला आपल्या काळातील सर्वाधिक पुरोगामी विचारांच्या अर्थतज्ज्ञांपैकी एक असलेल्या मरियाना मझ्झुकॅनो यांची ओळख करून देऊ इच्छितो. मझ्झुकॅनो या अशा अर्थतज्ज्ञांच्या, प्राधान्याने स्त्रिया, पिढीशी संबंधित आहेत. जे यावर विश्‍वास ठेवतात, की “पुरोगामी लोक नेहमीच त्यांच्या युक्तिवादापासून दूर जाण्याचे कारण म्हणजे ते संपत्ती पुनर्वितरणावर अति लक्ष केंद्रित करतात आणि ते संपत्ती निर्मितीवर पुरेसं लक्ष देत नाहीत.” अगदी अलीकडील आठवड्यांमध्ये, ज्याला आम्ही ‘आवश्यक कामगार’ म्हणण्यास सुरुवात केली आहे त्याची यादी संपूर्ण जगभर प्रकाशित केली गेली आहे आणि आश्‍चर्य म्हणजे ‘हेज फंड व्यवस्थापक’ आणि ‘बहुराष्ट्रीय कर सल्लागार’ यांसारखे व्यवसाय त्या यादीमध्ये कुठेही दिसले नाहीत. अगदी अचानकपणे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे, की आरोग्य सेवा, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि किराणा सामानाच्या दुकानात कोण खर्‍या अर्थाने महत्त्वपूर्ण काम करत आहे.
सन 2018 मध्ये दोन डच अर्थतज्ज्ञांनी एक अभ्यास केला. त्यांनी त्यामधून असा निष्कर्ष काढला, की कामकरी लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकांना त्यांचा व्यवसाय निरर्थक असल्याचा संशय वाटतो. यापेक्षाही गमतीदार गोष्ट म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायापेक्षा व्यापारी जगात चार पट जास्त ‘सामाजिकदृष्ट्या निरर्थक व्यवसाय’ असल्याचा निष्कर्ष आला.
हे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावरील स्वतः खोटा आव आणणारे ‘निरर्थक व्यवसायवाले’ लोक वित्त आणि व्यापाराच्या क्षेत्रांत कामास लागले आहेत. हे आपणास पुढील प्रश्‍नांकडे घेऊन जाते. वास्तविकपणे संपत्ती कुठे तयार केली जाते? फायनान्शिअल टाइम्ससारख्या मीडियाने (जसे, की त्यांचे नवउदारमतवादी निर्माते फ्राईडमन आणि हायेक) नेहमीच असा दावा केला आहे, की उद्योजक संपत्ती तयार करतात, राज्ये संपत्ती तयार करत नाहीत. सरकारे फार झाले, तर समंत्रक (Facilitator) आहेत. सरकारांनी चांगली पायाभूत सुविधा आणि आकर्षक कर सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्यानंतर दूर व्हावे; परंतु सन 2011 मध्ये सरकारचे कर्मचारी ‘उद्योगाचे शत्रू’ आहेत, असे एक राजकारणी तिरस्कारपूर्वक वारंवार म्हणत असल्याचे कानावर आल्यानंतर मझ्झुकॅतोच्या डोक्यात काही तरी चमकले. तिने काही संशोधन करायचे ठरवले. दोन वर्षांनंतर तिने एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाने योजना बनविणार्‍या जगाला हादरे दिले. त्याचे शीर्षक आहे : ‘The Entrepreneurial State’ (उद्योजकीय राज्य). तिच्या पुस्तकात मझ्झुकॅतोने हे दाखवून दिले, की केवळ शिक्षण, आरोग्यसेवा, कचरा गोळा करणे आणि पत्र पोचवण्याची सुरुवात सरकारपासून झाली नाही, तर खर्‍या अर्थाने विश्‍वसनीय नवकल्पनांचा उदयसुद्धा सरकारपासूनच झाला आहे.
आयफोनला स्टुपिड फोनऐवजी स्मार्ट फोन बनविणारा तंत्रज्ञानाचा प्रत्येक काप (इंटरनेट/जीपीएस, टचस्क्रीन, बॅटरी, हार्ड ड्राइव्ह, व्हाइस रेकगनिशन) हा सरकारच्या वेतनपटावर असणार्‍या संशोधकांनी विकसित केला होता आणि जे अ‍ॅपलला लागू होते तेच इतर तंत्रज्ञानातील महाकाय कंपन्यांनादेखील लागू होते. गुगल? गुगलला सर्च इंजिन विकसित करण्यासाठी सरकारकडून फार मोठे अनुदान मिळाले होते. टेस्ला? कुणीतरी गुंतवणूक करावी म्हणून टेस्ला ही कंपनी वणवण भटकत होती; परंतु तिला कुणीही गुंतवणूकदार मिळाला नाही. अखेरीस अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने 465 दशलक्ष डॉलरची मदत केली. (एलॉन मस्कने सुरुवातीपासूनच फार मोठे सरकारी अनुदान फस्त केले आहे. त्याच्या तीन मोठ्या कंपन्यांना – टेस्ला, स्पेस एक्स आणि सोलर सिटी – जवळपास एकूण पाच अब्ज डॉलर एवढी भरघोस रक्कम करदात्यांच्या पैशातून मिळाली होती.) मझ्झुकॅतोने तंत्रज्ञान मासिक ‘Wire’d’ ला सांगितले, की “जसं जसं मी जास्त पाहत गेले तसं तसं मला हे अधिकपणे जाणवलं, की राज्याची गुंतवणूक सगळीकडे आहे.”
हे खरं आहे, की प्रकल्पांमधील सरकारी गुंतवणुकीचे फायदे लगेच दिसत नाहीत. हे धक्कादायक आहे ना? नाही. त्यालाच खरं तर गुंतवणूक म्हणतात. उद्योग ही नेहमीच जोखीम पत्करण्याची गोष्ट आहे. मझ्झुकॅतो दाखवून देतात, की अनेक खासगी ‘उपक्रम’ भांडवलवाद्यांसोबतची समस्या ही आहे, की ते एवढी जोखीम पत्करण्यास तयार नसतात.
सन 2003 मध्ये सार्स रोगाच्या फैलावानंतर खासगी गुंतवणूकदारांनी कोरोना विषाणू संशोधनावरील काम तात्काळ बंद केले. ते त्यांच्यासाठी फायदेशीर नव्हते. दरम्यानच्या काळात सार्वजनिक वित्तीय साहाय्याने संशोधन चालूच राहिले. त्यासाठी अमेरिकन सरकारने 700 दशलक्ष डॉलर एवढ्या प्रचंड मोठ्या रकमेची तरतूद केली. (जेव्हा केव्हा त्यावरील लस येईल त्यावेळी तुम्हाला सरकारला धन्यवाद द्यावे लागतील.)
मझ्झुकॅतोची केस अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्याकडे औषधनिर्मिती उद्योगाचे उदाहरण आहे. औषधनिर्मितीमधील जवळपास प्रत्येक संशोधन व उपलब्धी ही सार्वजनिक वित्तसाहाय्य असलेल्या प्रयोगशाळांमधूनच झाली आहे. औषधोत्पादनातील रॉश (Roche) आणि फाईझर (Pfizer) सारख्या महाकाय कंपन्या मुख्यतः केवळ पेटंट खरेदी करतात आणि जुनी औषधे नवीन ब्रॅण्डस्च्या नावाखाली विकतात आणि त्यानंतर या कंपन्या मिळालेला नफा लाभांश म्हणून देण्यासाठी व परत आणखी शेअर्स विकत घेण्यासाठी वापरतात. (शेअरच्या किमती वाढविण्यासाठी ही युक्ती चांगली आहे.) या सगळ्यांमुळे 27 महाकाय औषधोत्पादन कंपन्यांना वार्षिक शेअरधारकांना वेतन देण्यास सक्षम केले व सन 2000 पासून त्यांना चौपट होण्यास मदत केली आहे.
यासंदर्भात मझ्झुकॅतोला विचारलं तर त्या म्हणतात, की हे बदलणं गरजेचं आहे. जेव्हा सरकार प्रमुख नवकल्पनेस अनुदान देत असेल, तर त्या म्हणतात, की उद्योगाने त्याचे स्वागत केले पाहिजे. आणखी काय पाहिजे, हीच तर सगळी कल्पना आहे; परंतु नंतर सरकारला त्याची सुरुवातीची रक्कम परत मिळायला पाहिजे, तीही व्याजासह. हे अत्यंत चीड आणणारं आहे, की आता सध्या ज्या खासगी कंपन्यांना मोठमोठी आर्थिक मदत मिळते आहे, त्याच कंपन्या सरकारची सर्वांत मोठ्या प्रमाणात कर फसवणूक करतात. अ‍ॅपल, गुगल आणि फाईझरसारख्या खासगी कंपन्यांनी जगभरात त्यांचे अब्जावधी रुपये अत्यंत माफक वा कमीत कमी कर आकारणार्‍या देशांमध्ये साठवले आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या करातील माफक हिस्सा द्यायला पाहिजे, याबाबत कसलाच प्रश्‍न उपस्थित होत नाही; परंतु मझ्झुकॅतोच्या मतानुसार, यापेक्षाही आणखी काय महत्त्वपूर्ण आहे, तर सरतेशेवटी सरकार स्वतःच्या उपलब्धीच्या श्रेयावर दावा करते. तिचे सर्वांत आवडते उदाहरण म्हणजे 1960 च्या दशकातील अवकाश स्पर्धा. सन 1962 च्या भाषणात माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी जाहीर केले, की “या दशकात आम्ही चंद्रावर जाण्याचे आणि इतर गोष्टी करण्याचे ठरवले आहे; परंतु आम्ही या गोष्टी सोप्या आहेत म्हणून करणार नाही, तर त्या कठीण आहेत म्हणून.”
या दिवसांमध्ये आणि या काळात आपणसुद्धा उद्योजकीय राज्याच्या नवकल्पनांच्या अतुलनीय शक्तीला हाक देणार्‍या प्रचंड मोठ्या आव्हानांचा सामना करत आहोत. मानवी प्रजातीला सर्वांत मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे हवामान बदल. नवउद्योजकांसाठी ही फारच गंभीर समस्या आहे. आता आपणाला कधी नव्हे ते हवामान बदलाने अत्यावश्यक केलेले रूपांतरण प्राप्त करण्यासाठी केनेडीच्या भाषणातील गौरव केलेल्या मानसिकतेची गरज आहे. हा अपघात नाहीये. नंतर मझ्झुकॅतो, ब्रिटिश-व्हेनेझुवेलियन अर्थतज्ज्ञ कार्लोटा पेरेझ यांच्यासह ग्रीन न्यू डीलच्या बौद्धिक जननी बनल्या. ग्रीन न्यू डील ही जगाने हवामान बदलाची समस्या सोडविण्यासाठी बनविलेली सर्वात मोठी अशी महत्त्वाकांक्षी योजना होती.
मझ्झुकॅतोच्या दुसर्‍या एक मित्र आहेत- अमेरिकन अर्थतज्ज्ञ स्टेफनी केल्टन. त्या म्हणतात, जर गरज पडली तर सरकार त्याच्या महत्त्वाकांक्षांना वित्तीयसाहाय्य करण्यासाठी अधिक प्रमाणात नोटा छापू शकते आणि त्याने राष्ट्रीय कर्ज व तूट यांची काळजी करू नये. (मझ्झुकॅतो आणि केल्टनसारखे अर्थतज्ज्ञांकडे सरकारला घरगुती सामान वा कुटुंबातील सदस्यांसारखे मानणार्‍या जुन्या विचारसरणीच्या राजकारण्यांसाठी, अर्थतज्ज्ञांसाठी व पत्रकारांसाठी जास्तीचा धीर नाहीये. शेवटी काय, कुटुंबातील सदस्य वा घरातील सामान कर गोळा करू शकत नाहीत किंवा ते स्वतःच्या चलनामध्ये एखाद्याला पैसे देऊ शकत नाहीत.)

आपण इथे काय बोलतोय, तर आर्थिक विचारप्रकियांमध्ये क्रांती आवश्यक आहे. सन 2008 च्या प्रेचप्रसंगानंतर अत्यंत कडक वित्तीय शिस्त राबवली गेली. आता आपण अशा काळात जगात आहोत जेव्हा केल्टनसारख्या (The Deficit Myth असे बोलके शीर्षक असलेल्या पुस्तकाच्या लेखिका) व्यक्तीला चक्क फायनान्शिअल टाइम्सने आधुनिक दिवसाचा मिल्टन फ्राईडमन म्हणून गौरविले.
या वृत्तपत्राने एप्रिलच्या प्रारंभी असे लिहिले, की सरकारने ‘सार्वजनिक सेवांकडे दायित्व म्हणून न पाहता गुंतवणूक म्हणून पाहावे.’ केल्टन आणि मझ्झुकॅतो अनेक वर्षे ज्या गोष्टीसाठी झगडल्या त्याचेच प्रतिध्वनी या वृत्तपत्रामध्ये ऐकू येत होते. या स्त्री अर्थतज्ज्ञांबद्दलची सर्वांत गमतीशीर बाब म्हणजे, की त्या केवळ भाषणबाजी करून समाधान मानणार्‍या नव्हत्या. त्यांना परिणाम हवे होते. उदाहरणार्थ, केल्टन या एक अत्यंत प्रभावी राजकीय सल्लागार आहेत. पेरेझ यांनी अगणित कंपन्यांचे व संस्थांचे सल्लागार म्हणून काम केले आहे. मझ्झुकॅतोसुद्धा एक जन्मजात नेटवर्कर आहेत. जगातील संस्थांकडे जाण्याचे मार्ग त्यांना माहीत आहेत. दावोसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या त्या केवळ एक नियमित सदस्यच नाहीत (दावोस इथे दरवर्षी जगातील श्रीमंत व ताकदवान परिषद आयोजित केली जाते), तर या इटलीच्या अर्थतज्ज्ञाने अमेरिकन सिनेटर एलिझाबेथ वॉरेन आणि काँग्रेस स्त्री सदस्या अलेक्झांड्रिया ओर्केसिओ-कॉर्टेस आणि स्कॉटलंडच्या पहिल्या मंत्री निकोला स्टुरजिऑन यांनादेखील सल्ला दिलेला आहे. युरोपियन पार्लमेंटने मागच्या वर्षी महत्त्वाकांक्षी नवकल्पना कार्यक्रमास मंजुरी दिली, त्या कार्यक्रमाची संहितादेखील मझ्झुकॅतो यांनीच तयार केली होती.
एका प्रसंगी मझ्झुकॅतो गमतीने म्हणाल्या, “मला कामाचा परिणाम हवाय. अन्यथा हा शँपेन समाजवाद आहे : तुम्ही आता जाता, अधूनमधून बोलता आणि काहीच घडत नाही.”

कल्पना कशा प्रकारे जगाला जिंकतात?

तुम्ही जग कसे बदलविता. पुरोगामीवादी गटाला हा प्रश्‍न विचारा आणि तुम्हाला लगेच कुणी तरी जोसेफ ओव्हरटनचे नाव सांगेल. ओव्हरटन मिल्टन फ्रिडमनच्या मतांचा समर्थक होता. त्याने नवउदारमतवादी विचार गटासाठी काम केले आणि अनेक वर्षे फार कमी आकारणी व छोट्या सरकारसाठी त्याने मोहीम राबवली. अकल्पनीय गोष्टी शेवटी कशा अटळ बनतात, या प्रश्‍नामध्ये त्यांना रस होता. ओव्हरटन म्हणाला, एक खिडकीची कल्पना करा. या खिडकीच्या आतमध्ये ज्या कल्पना पडतात त्यांना ‘स्वीकारार्ह’ असे माना आणि त्या ‘स्वीकारार्ह’ असतातच किंवा कोणत्याही दिलेल्या वेळी त्या ‘लोकप्रिय’ असतात. जर तुम्ही राजकारणी असाल आणि तुम्हाला पुन्हा निवडून येण्याची इच्छा असेल, तर तुम्ही या खिडकीच्या आतमध्येच थांबा; परंतु जर तुम्हाला हे जग बदलायचे असेल, तर तुम्हाला ही खिडकी बदलावी लागेल. म्हणजेच तुम्हाला त्या खिडकीपासून दूर जावे लागेल. कसे? स्वतःला काठावर ढकलत. स्वतः अनार्किक, स्थितप्रज्ञ आणि अवास्तववादी होऊन.
अलीकडील वर्षांमध्ये ओव्हरटन विंडो निःसंशयपणे बदलली आहे. जी एकेकाळी परिघावरती होती ती आता मुख्य धारेत आली आहे. एका फ्रेंच अर्थतज्ज्ञाचा संदिग्ध आलेख ‘वॉल स्ट्रीटचा ताबा घ्या’ हे घोषवाक्य बनले (आम्ही 99 टक्के लोक आहोत.) वॉल स्ट्रीटचा ताबा घ्या घोषणेने क्रांतिकारी अध्यक्षीय उमेदवारास मार्ग करून दिला आणि बर्नी सँडर्सने बिडेनसारख्या इतर राजकारण्यांना स्वतःच्या दिशेने ओढले.
या दिवसांमध्ये अधिकाधिक अमेरिकन युवा भांडवलवादापेक्षा समाजवादाच्या बाजूने उभे राहत आहेत, असे दिसते. 30 वर्षांपूर्वी हे सगळे अकल्पनीय राहिले असते; पण ते आज घडतेय. ते सगळे तरुण आज समाजवादाचे समर्थन करताना दिसतात (1980 च्या प्रारंभीच्या दशकामध्ये युवा मतदार नवउदारमतवादी रिगनचे सर्वांत मोठे आधारभूत पाया होते.); परंतु सँडर्सने प्राथमिक फेर्‍या गमावल्या नाहीत का? आणि मागच्या वर्षी युनायटेड किंगडममध्ये समाजवादी जेरेमी कॉर्बिन यांना नाट्यमय निवडणूक पराभव पाहावा लागला नाही का? निश्‍चितपणे हे झाले; परंतु निवडणुकीचा निकाल हे काही काळाचे एकमेव चिन्ह नाहीये. कॉर्बिनने सन 2017 आणि 2019 मधील निवडणुकांमध्ये पराभव पत्करला असेलही; परंतु कन्झर्व्हेटिव्ह योजना स्वतःच्या जाहीरनाम्यापेक्षा मजूर पक्षाच्या वित्तीय योजनांच्या बरीच जवळ गेली होती. त्याचप्रमाणे सन 2020 मध्ये जरी सँडर्स हे बिडेन यांच्यापेक्षा अधिक पुरोगामी हवामान योजनेबद्दल बोलले असले, तरी सँडर्सच्या सन 2016 मधील हवामान योजनेपेक्षा बिडेन यांची हवामान योजना अधिक पुरोगामी आहे.
‘न्यू लेबर अ‍ॅण्ड टोनी ब्लेअर’ म्हणजे माझी सर्वांत मोठी उपलब्धी, असं थॅचर जेव्हा म्हणाल्या तेव्हा त्या गमतीशीरपणे म्हणत नव्हत्या. तसा त्यांना विनोदही करायचा नव्हता. जेव्हा त्यांचा पक्ष सन 1997 मध्ये पराभूत झाला, तेव्हा तो पराभव त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने थॅचर यांच्या कल्पनांसह केला होता. थॅचर यांच्या कल्पना प्रतिस्पर्ध्याच्या पथ्यावर पडल्या.
जगाला बदलविणे हा तसा लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचा प्रकार आहे. कुणीही तुमचे आभार मानणार नाही. जेव्हा तुमचे प्रतिस्पर्धी नम्रपणे कबूल करतात, की तुम्ही बरोबर होतात असा विजयश्रीचा क्षण येत नाही. राजकारणामध्ये तुम्ही सर्वोत्तम सर्वोत्तम गोष्टीची आशा करू शकता आणि ती गोष्ट म्हणजे, उचलेगिरी किंवा दुसर्‍याच्या कल्पना चोरून वापरणे. सन 1970 मध्ये फ्रिडमन यांनी हे अगोदरच समजून घेतले होते. ‘माझ्या कल्पना या जगास कशा प्रकारे जिंकतील’ याचे वर्णन फ्रिडमन यांनी एका पत्रकाराला केले होते. ते वर्णन पुढील चार अंकात सादर करता येईल –


अंक एक : माझ्यासारख्या चक्रम माणसाचे दृष्टिकोन दुर्लक्षित केले जातात.
अंक दुसरा : पारंपरिक विश्‍वासाचे संरक्षक अस्वस्थ होतात, कारण कल्पनांमध्ये सत्यांश असल्याचे दिसते.
अंक तिसरा : लोक म्हणतात, ‘आम्हाला माहीत आहे हा अव्यवहार्य आणि सैद्धांतिकदृष्ट्या टोकाचा दृष्टिकोन आहे; परंतु अर्थात, आम्हाला या दिशेने जाण्यासाठी अधिक नेमस्त मार्गांकडे पाहणे अनावश्यक आहे.’
अंक चार : प्रतिस्पर्धी माझ्या कल्पना असमर्थनीय व्यंगचित्रामध्ये रूपांतरित करतात, जेणेकरून ते पुढे जातात आणि मी अगोदर जिथे उभा होतो ती जागा ताब्यात घेतात.”

तरीही मोठ्या कल्पना चक्रम व्यक्तीकडून आल्या, तर त्याचा अर्थ असा होत नाही, की प्रत्येक चक्रम व्यक्तीकडे मोठ्या कल्पना असतात आणि जरी पुरोगामी कल्पना मधूनमधून लोकप्रिय होत असल्या तरी एखादे वेळी निवडणूक जिंकणे चांगलेच असेल ना. वारंवारपणे ओव्हरटन विंडो ही डाव्यांच्या अपयशासाठी एक सारवासारव म्हणून वापरली जाते. जसे, की ‘कमीत कमी आम्ही कल्पनांचे युद्ध जिंकले.’ अनेक स्वयंघोषित ‘पुरोगामी’ लोकांकडे सत्ता मिळवण्यासाठी केवळ अर्ध्यामुर्ध्या योजना असतात. म्हणजे जर खरोखरंच त्यांच्याकडे काही योजना असल्या, तर त्या या अशाच अर्धवट स्वरूपात असतात; परंतु तुम्ही त्यावर टीकाटिपणी केल्यावर तुमच्यावर देशद्रोही म्हणून शिक्का मारला जातो. वास्तविकवणे, डाव्यांचा असा इतिहास आहे, की ते बदनामीचा रोख दुसर्‍याकडे वळवितात. वृत्तपत्रे, पायाभूत सुविधा व त्यांच्याच पक्षातील उच्च स्थान भूषविणार्‍या नेत्यांकडे डावे बदनामीचा रोख वळवितात; परंतु ते क्वचितच जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात.


अलीकडे लॉकडाऊनच्या काळात मी ‘Difficult Women’ हे पुस्तक वाचले आणि त्या पुस्तकाने मला पुन्हा एकदा याची जाणीव करून दिली, की हे जग बदलविणे खरंच खूप अवघड आहे. हे पुस्तक ब्रिटिश पत्रकार हेलन लेविस यांनी लिहिले आहे. ग्रेट ब्रिटेनमधील स्त्रीवादाच्या इतिहासाचा आढावा यामध्ये घेतलेला आहे. एका अधिक चांगल्या जगाची निर्मिती करू इच्छिणार्‍या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे मला वाटते. लेविस यांच्या मतानुसार, Difficult म्हणजे तीन गोष्टी –


1. हे जग बदलविणे कठीण आहे. तुम्हाला त्यासाठी त्याग करावाच लागतो.
2. अनेक क्रांतिकारक कठीण असतात. दुराग्रही, घृणास्पद आणि हेतुपुरस्सर हंगामा करणार्‍या लोकांपासून प्रगती सुरू होते, असे दिसते.
3. चांगले काम करणे म्हणजे तुम्ही परिपूर्ण आहात, असे नव्हे. इतिहासाचे नायक हे क्वचितच संपूर्ण स्वच्छ असतात; परंतु नंतर त्यांना स्वच्छ केले जाते.


लेविसची टीका अशी आहे, की अनेक कार्यकर्ते या गुंतागुंतीस दुर्लक्षित करतात असे दिसते आणि ते उघडपणे कमी परिणामकारक करतात. ट्विटरकडे पाहा. ट्विटर अशा लोकांनी गच्च भरलेले आहे. ज्यांना इतर ट्विटर्सच्या मतांचा न्यायनिवाडा करण्यामध्ये अधिक रस असल्याचे दिसून येते. एखादा पहिलाच गैरसोयीचा शेरा मारल्यामुळे किंवा वादग्रस्त विधानाचा डाग पडल्यामुळे कालचा नायक दुसर्‍याच दिवशी तोंडावर पडलेला असतो. लेविस असे दाखवितात, की कोणत्याही चळवळीमध्ये पुष्कळ अशा भूमिकांचे सादरीकरण होते आणि त्यातून वारंवार अशाश्‍वत, त्रासदायक युती आणि तडजोडी निकडीच्या बनतात. ब्रिटिश मताधिकारासारख्या चळवळीने मच्छीमारांच्या बायकांपासून ते श्रीमंत-प्रतिष्ठित स्त्रिया आणि गिरणी कामगार मुलींपासून ते भारतीय राजकन्यांना एकत्र आणले गेले. सन 1918 मध्ये 30 वर्षांपुढील मालमत्ताधारक स्त्रियांना मताधिकार प्राप्त करण्याच्या विजयी क्षणापर्यंत ही गुंतागुंतीची युती टिकली (हे बरोबर आहे, की सुरुवातीला केवळ विशेषाधिकार असलेल्या स्त्रियांनाच मताधिकार मिळाला. ती एक समंजस तडजोड होती, असे सिद्ध झाले. कारण त्या पहिल्या पावलाने पुढच्या अपरिहार्यतेस जोडले : सन 1928 मध्ये वैश्‍विक स्त्री मताधिकार मंजूर झाला.) आणि नाही, अगदी त्यांचे हे यश या सगळ्या स्त्रीवाद्यांना मित्रांमध्ये रूपांतरित करू शकले नाही. असो. लेविसच्या मतानुसार, “अगदी मताधिकार मिळावा म्हणून झगडणार्‍या स्त्रियांच्या या गटातील सदस्यांमध्ये व्यक्तिमत्त्व संघर्ष झाले आणि त्यांना मिळालेल्या भव्य विजयावर विरजण पडले. विजयाच्या आठवणी आंबट झाल्या.”
प्रगती गुंतागुंतीची आहे, असे दिसते. आपण ज्या मार्गाने सक्रियता समजून घेतो तोही वास्तविकता विसरून जातो, की आपणास या सगळ्या वेगवेगळ्या भूमिकांची गरज आहे. आमची भावना- टीव्हीवरील चर्चांमध्ये आणि संध्याकाळच्या भोजनप्रसंगी- अशी आहे, की आपण आपल्या आवडीची सक्रियता निवडावी. आम्ही गे्रटा थुनबर्गला सलाम करतो, तिचे कौतुक करतो व तिला पाठिंबा देतो; परंतु विलोप बंडखोरवाल्यांच्या (Extinction Rebellion) रस्त्यावरील धरणे आंदोलनाबद्दल संपात व्यक्त करतो किंवा आपण वॉल स्ट्रीटचा ताबा घ्या म्हणणार्‍या आंदोलनकर्त्यांचे कौतुक करतो; परंतु दावोसकडे निघालेल्या दबाव गट सदस्यांचा तिरस्कार करतो.
बदल अशा प्रकारे घडत नाही. या सगळ्या लोकांनी त्यांच्या भूमिका वठविल्या पाहिजेत. त्या भूमिका सादर केल्या पाहिजेत. प्राध्यापक आणि अराजकतावादी अशा दोघांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका वठविल्या पाहिजेत. मनुष्यांना एकत्र आणणार्‍या नेटवर्कर आणि आंदोलनकर्त्याने भूमिका बजावल्या पाहिजेत. चिथावणीखोर आणि शांतता स्थापित करणार्‍यांनी, अकादमिक परिभाषेत लिहिणार्‍यांनी आणि विस्तृत वाचक श्रोत्यांसाठी ते भाषांतर करणार्‍यांनी भूमिका पार पाडल्या पाहिजेत. दृश्याच्या पाठीमागे उभे राहून दबाव गटाची भूमिका पार पाडणार्‍यांनी आणि ज्यांना दंगल पोलीस फरपटत ओढत नेतात त्यांनी भूमिका वठविल्या पाहिजेत. असा एक बिंदू येेतो जेव्हा ओव्हरटन विंडोच्या काठांवर प्रवास करणे पुरेसे होत नाहीये. असा एक बिंदू येतो जेव्हा आपणास संस्थांमधून आंदोलन करत जाण्याची आणि एके काळी अत्यंत पुरोगामी असलेल्या कल्पनांना सत्ता केंद्राच्या ठिकाणी आणण्याची वेळ येते. मला वाटते, ती वेळ आताची आहे.
मागील 40 वर्षे वर्चस्व गाजवणारी विचारधारा अस्तंगत होत आहे. तिची जागा कोण घेईल? कोणालाही हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. याची कल्पना करणे कठीण नाहीये, की हा पेचप्रसंग आपणाला यापेक्षाही अधिक गडद अंधार्‍या मार्गावर घेऊन जाईल. राज्यकर्ते अधिक सत्ता हस्तगत करण्यासाठी त्याचा वापर करतील. ते त्यांच्या जनतेच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालतील आणि वंशवाद व द्वेषाच्या ज्वालांना भडकवतील; परंतु परिस्थिती भिन्न असू शकते. गोष्टी बदलू शकतात. आपण इतर मार्गानेसुद्धा कल्पना करू शकतो. यासाठी आपण सर्वांनी अगणित कार्यकर्त्यांच्या आणि अकादमिक व्यक्तींच्या, नेटवर्कर्स आणि आंदोलनकर्त्यांच्या कठीण परिश्रमांना धन्यवाद दिले पाहिजेत. ही महामारी आपणास नवीन मूल्यांच्या मार्गावर घेऊन जाईल.
जवळजवळ सगळे लोक स्वार्थी असतात, अशी एका मतप्रणालीने व्याख्या केली होती आणि मानवी स्वभावाच्या त्या उपेक्षावादी दृष्टिकोनापासून हे सगळे नंतरच घडले- म्हणजे खासगीकरण, वाढणारी असमानता आणि सार्वजनिक क्षेत्राची झीज.
आता एका भिन्न, अधिक वास्तववादी दृष्टिकोन असलेल्या मानवी स्वभावासाठी एक अवकाश उघडला आहे ः मानवजात सहकार्य करण्यासाठी उत्क्रांत झाली आहे. या धारणेपासून बाकी सगळे घडू शकेल – म्हणजे विश्‍वासावर आधारलेले सरकार, ऐक्यभावात रुजलेली करव्यवस्था आणि आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेली शाश्‍वत गुंतवणूक आणि हे सगळे या शतकाच्या सर्वांत मोठ्या चाचणीसाठी वेळेच्या आत तयार करावे लागणार आहे. आपली महामारी स्लो मोशनमध्ये आहे अन् तिचे नाव आहे, हवामान बदल.
हे पेचप्रसंग आपणास कुठे घेऊन जातील, हे कोणासही माहीत नाही; परंतु मागच्या काळाशी तुलना करता किमान आपण अधिक तयारीत आहोत. ‘Neoliberalism Is Ending : What Comes Next?’ अशा शीर्षकाचा हा लेख एलिझाबेथ मॅन्टन यांनी डच भाषेमधून इंग्रजी भाषेत भाषांतरित केला आहे.

– रूटगर ब्रेगमॅन


(हा लेख राजक्रांती वलसे यांनी इंग्रजीमधून मराठीत भाषांतरित केला आहे. भाषांतरकार बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.